राजापूर पोलीस दलातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उपक्रम
पाचल:
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर ला सकाळी ७ वाजता राजापूर तालुका पोलीस प्रशासनाने ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ (RUN FOR UNITY) चे शानदार आयोजन केले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात प्रसारित करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली ही ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांच्यासह एकूण ३० अंमलदार सहभागी झाले होते. पहाटेच्या वेळी सुरू झालेल्या या दौडमुळे तालुक्यात एक उत्साहाचे आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी सहभागी झालेल्या सर्व पोलीस प्रशासनाने ‘लोह पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूल्यांचे आणि विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. राजापूर तालुक्याच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी सर्व पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे (युनिटीने) काम करण्याचे आवाहन करण्यात आले. सरदार पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेल्या योगदानाचा आदर्श घेऊन, पोलीस दलाने समाजाला दिशा देण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असा संदेश या ‘एकता दौड’च्या माध्यमातून देण्यात आला. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे राजापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.