बुद्धविहाराच्या जागेच्या ताब्यासाठी बौद्धांचा एल्गार; रत्नागिरीत आंबेडकरी जनतेचा विराट मोर्चा
थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने आयोजन : आरपारच्या लढाईचा निर्धार
रत्नागिरी:
रत्नागिरीतील ऐतिहासिक थिबा राजा कालीन बुद्धविहाराची जागा बौद्ध समाजाच्या ताब्यात मिळावी आणि आरक्षित धार्मिक स्थळावर सुरू असलेली कम्युनिटी सेंटर बांधकाम प्रक्रिया तत्काळ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी आंबेडकरी जनतेकडून विराट मोर्चा काढण्यात आला. थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. “बुद्धविहार आमचा हक्काचा वारसा आहे, तो आम्हाला परत द्या,” अशा घोषणांनी रत्नागिरीचे वातावरण दुमदुमून गेले.

मोर्चाची सुरुवात थिबा कालीन बुद्धविहाराच्या परिसरातून सकाळी साडेअकराच्या सुमारास त्रिसरण आणि पंचशील घेत करण्यात आली. या वेळी भंत्ते सुमेधबोधी आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव, उपाध्यक्ष प्रकाश पवार, दीपक जाधव, तसेच बौद्ध समाजातील असंख्य नागरिकांनी केले. रत्नागिरी तालुक्यासह जिल्हाभरातून आलेल्या आंबेडकरी बांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मोर्चा थिबा कालीन बुद्धविहार येथून जेलरोड मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला. या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. घोषणांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाचे रूपांतर झाले. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना संघर्ष समितीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले.