स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उबाठाकडे उमेदवार आहेत का : तालुकाप्रमुख बंड्या साळवी
रत्नागिरी :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. या निवडणुकीसाठी उबाठाकडे उमेदवार आहेत का, याचे आत्मपरीक्षण माजी आमदार बाळ माने यांनी आधी करावे, अशी सडतोड भूमिका शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्यावर टीका केल्याने, रत्नागिरी शिवसेना आक्रमक झाली आहे. माजी आमदार बाळ माने यांना जशास तसे उत्तर देताना तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उबाठाकडे किती उमेदवार आहेत, याचा शोध बाळ माने यांनी घ्यावा.
नगर परिषद निवडणुकीसाठी ३२, पंचायत समिती करिता २० तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १० असे उमेदवार लागणार आहेत. तेवढे उमेदवार बाळ माने यांना या निवडणुकीत मिळतील, याचे आत्मपरीक्षण त्यांनी आधी करावे, असे बंड्या साळवी यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शहराच्या विकास कामासाठी भरघोस निधी दिला आहे. ना. सामंत हे राज्याचे नेते आहेत. तरीही अहोरात्र ते काम करत आहेत. राज्यातील कार्यक्रम आटोपून ते मतदार संघात काम करत आहेत. दिवाळीच्या दिवशी देखील ते मतदार संघात जनतेशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा देत होते.