बदलत्या युगात आता टपाल खात्याने रजिस्टर सेवा व स्पीड पोस्ट सेवेचे एकत्रीकरण केले: डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले
रत्नागिरी: भारतीय डाक सेवा ही डाकसेवा जनसेवा हे ब्रीद घेऊन १७१ वर्षे कार्यरत आहे. बदलत्या युगात आता टपाल खात्याने रजिस्टर सेवा व स्पीड पोस्ट सेवेचे एकत्रीकरण केले आहे. त्यामुळे ही सेवा न्यायिक पत्रे, वकिल, व्यावसायिक यांच्यासाठी सोयीची ठरणार आहे. तसेच परदेशांत आपल्या कुटुंबियांनी दिवाळी फराळ पाठवण्यासही रत्नागिरीतून सुरवात झाली आहे, अशी माहिती डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डाकघर अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला डाकघर उपअधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, गजानन करमरकर उपस्थित होते. श्री. सरंगले यांनी सांगितले की, आजच्या युगात ५० पैसे एवढ्या अल्पदरात डाक सेवा दिली जात आहे. डाकविभाग त्यामागे जवळपास २० रुपयांचा तोटा सहन करत आहे, परंतु डाक ही जनसेवा असल्याने ही सेवा दिली जात राहील. १ ऑक्टोबरपासून रजिस्टर सेवा व स्पीड पोस्ट सेवेचे एकत्रीकरण झाले आहे. गेल्याच महिन्यात जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्र पाठवून टपाल खात्याच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल. अनेक संस्था, वकिल यांना स्पीड पोस्टची आवश्यकता भासते.
अॅड्रेसी स्पेसिफिक या सेवेसाठी न्यायिक पत्रे, वकिलांचे पत्रे पाठवण्यासाठी नवीन दर लागू झाला आहे. यानुासर ५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटासाठी स्थानिक १९ रुपये ते कमाल ४७ रुपये, ५१ ते २५० ग्रॅमसाठी स्थानिक २४ व कमाल ७७ रुपये आणि २५१ ते ५०० ग्रॅमसाठी स्थानिक २८ व कमाल ९३ रुपये भरावे लागतील. अॅड्रेसी स्पेसिफिक रजिस्ट्रेशनसाठी ५ रुपये भरून फक्त त्याच व्यक्तीला वितरण करता येईल. पोचपावती पत्र पाठवण्यास प्राप्त होण्याची सुविधा दहा रुपये व जीएसटी भरून घेता येईल. तसेच मोबाईल ओटीपी आधारावर वितरण करण्यासाठी ५ रुपये अधिक प्रभार भरावा लागेल.
चौकट १
दिवाळी फराळ परदेशात
दिवाळीचा फराळ युरोपमधील देशांसह अमेरिकेमध्येही पाठवता येईल. त्यासाठी फराळाच्या पदार्थांची पूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. १५ किलोपर्यंतच्या एका पार्सलसाठी ५५०० रुपयांपासून पुढे प्रत्येक देशानुसार वेगवेगळा खर्च येणार आहे. गेल्या वर्षी २८ ग्राहकांनी असा फराळ पाठवला होता, त्यातून टपाल विभागाला १ लाख ७९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आता साधारण १५ जणांनी फराळ पाठवला असून पुढील चार दिवसांत ही संख्या वाढेल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.