रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे काम आपण सर्वांनी पुढे नेऊया- प्रमोद कोनकर
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचा स्थापना दिन उत्साहात
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र स्थापन होऊन चार वर्षे झाली. या चार वर्षांच्या कालावधीत उपकेंद्राकडून संस्कृत व संस्कृतीनिष्ठ कार्यक्रमांचे आयोजन रत्नागिरीकरांसाठी करण्यात आले आहे. सध्या भारतीय संस्कृती आणि संस्कृत भाषेविषयी जनमानसात कुतुहूल निर्माण होत आहे. त्यामुळे योग्य वेळी हे उपकेंद्र रत्नागिरीत कार्यरत झालेले आहे. त्यामुळे यापुढे उपकेंद्राचे काम आपण सर्वांनी संघटितपणे पुढे घेऊन जाऊया, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी केले. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात उपकेंद्राच्या चतुर्थ स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली आणि यानंतर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या ४ वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली. प्रमोद कोनकर पुढे म्हणाले की, संस्कृत भाषेच्या माध्यमातून आपण संस्कृती आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच आचरणात आणतो तर अशावेळी आपण संस्कृत भाषेसोबतच संस्कृती जोपासणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्याकडील ज्ञान हे समाजापर्यंत नेणे गरजेचे आहे. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे राबवले जाणारे कार्यक्रम आणि उपक्रम इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे त्यामुळे उपकेंद्राची महती प्रत्येकापर्यंत पोहोचेल.
उपकेंद्रातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशांक पाटील म्हणाले की, उपकेंद्रात जेव्हापासून नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला आहे, तेव्हापासून रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राद्वारे आयोजित जाणाऱ्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारप्रक्रियेला चालना मिळते.
रत्नागिरी उपकेंद्राला स्थापन होऊन चार वर्षे झाल्याबद्दल उपकेंद्रातील कर्मचारी प्रथमेश घोसाळे, करण कीर, अपर्णा कोकरे, साक्षी भाटकर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिवाय कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेल्या मानसी यमगर, पूर्वा पावसकर, महादेव काळे, अपूर्वा मुसळे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच उपकेंद्राला नेहमीच सहकार्य करणारे पत्रकार- छायाचित्रकार मकरंद पटवर्धन यांचा देखील सत्कार डॉ. दिनकर मराठे यांनी केला.
अध्यक्षीय भाषणात रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे म्हणाले की, आता चार वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाली जरी असली तरी जबाबदारी अधिक वाढली आहे. रत्नागिरीकरांसाठी येत्या काळात संस्कृत, योग यांच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. उपकेंद्राला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. या संस्कृत केंद्रासाठी राजाश्रय मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री, पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे केंद्र रत्नागिरीत आले आहे. संस्कृत प्रसाराचे कार्य उपकेंद्रातर्फे सुरू आहे.
उपकेंद्राने आत्मविश्वास दिला म्हणून हे यश प्राप्त करू शकले. रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड होण्यामागे उपकेंद्राने माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. उपकेंद्रातील प्रा. अक्षय माळी, प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी यांनी सतत मार्गदर्शन केले. मी या उपकेंद्रात उपचारात्मक योग शिकण्यासाठीच बीए योगशास्त्र विषयासाठी प्रवेश घेतला होता मात्र तो आता सार्थ ठरल्याचे मला समाधान आहे. या उपकेंद्रात विविध प्रगत आसने देखील शिकवली असल्याने मला हे यश मिळाले असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा योगासन स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेल्या बीए योगशास्त्राची विद्यार्थिनी पूर्वा पावसकर यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कश्मिरा दळी यांनी केले. समन्वयक स्वरूप काणे यांनी आभार मानले.