
जिल्ह्याला मिळणार ३५ नव्या आशा सेविका
पारदर्शकता आणण्यासाठी भरतीचे ग्रामपंचायतीचे अधिकार काढले
रत्नागिरी:
जिल्हयाला नव्या ३५ आशा सेविका मिळणार आहेत. त्यामुळे संबंधित तालुक्यांमध्ये भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र यावेळी पारदर्शकता आणण्यासाठी ग्रामपंचायतीचे अधिकार काढून ते आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मानधन वाढले असल्याने इच्छुकांमध्ये चुरसही वाढली आहे.
आरोग्य विभागाच्या कामकाजाचा विचार करता त्यात आशा सेविकांचेही मोठे योगदान असते. त्यामुळे गावागावात त्यांचे असणे महत्वाचे ठरत आहे. सध्याचा विचार करता जिल्हयात हजारो आशा सेविका कार्यरत आहेत. काही वर्षे मागे जाता त्यांना अल्प मानधनात काम करावे लागत होते. मात्र अलिकडे या मानधनात बऱ्यापैकी वाढ झाली असून नियमित काम करणाऱ्या आशांना कमीत कमी १० हजार रुपये इतके मानधन मिळते. यापेक्षा जास्त मानधन घेणाऱ्या आशाही जिल्हयात आहेत.
असे असताना काही गावांचा वाढता विस्तार लक्षात घेता येथे कार्यरत असणाऱ्या आशांवर कामांचा ताण येत असल्याने तेथे आणखी आशा घ्याव्यात, अशी मागणी होत होती. त्यानुसार शासनाच्या आरोग्य सेवा अभियान संचालकांतर्फे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हयात ३५ आशा सेविका घेतल्या जाणार असून त्यात मंडणगडमधील भिंगळोली, दापोली पाजपंढरी, वाघवे, बांधतिवरे, खेड असगणी, धामणदेवी, चिपळूण मिरजोळी, वीर देवपाट, वहाळ, संगमेश्वरमध्ये ५, रत्नागिरीत १८, लांजा १, राजापूरमध्ये १२ आशा सेविकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पूर्वी या पदावर काम करण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते. मात्र आता वाढणारे मानधन, दिले जाणारे अधिकार व भविष्यात शासनाचे कर्मचारी म्हणून दर्जा मिळण्याची आशा यामुळे उमेदवारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी ९ उत्तीर्ण ते पुढे अशी शिक्षणाची अट असताना यात पदवीधर महिला अर्ज भरण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.