उक्षी रेल्वे स्टेशन दरम्यान प्रवाशाची लाखांची रोकड लंपास!
दिवा पसेंजर मधील घटना, झोपेचा फायदा घेऊन लुटले
रत्नागिरी: रत्नागिरीतून निघालेल्या दिवा पॅसेंजर ट्रेनमध्ये एका प्रवाशाला झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एक लाख रुपयांची रोकड आणि इतर ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही चोरी रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते उक्षी रेल्वे स्टेशन दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज कमलाकर भोसले (वय ३०, रा. नेरळ, कर्जत, मूळ रा. गावखडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या चोरीची फिर्याद दाखल केली आहे.
भोसले हे खाजगी नोकरी करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून २०२५ रोजी पहाटे ६.१९ ते ७.०० वाजण्याच्या सुमारास ते दिवा पॅसेंजर ट्रेनच्या तिसऱ्या डब्यातून प्रवास करत होते. रत्नागिरी स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतर उक्षी रेल्वे स्टेशनजवळ आले असता, त्यांना झोप लागली होती. याच झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या साहित्यावर डल्ला मारला. चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने त्यांचा ऐवज चोरून नेला. चोरीला गेलेल्या मालामध्ये एकूण १,००,५००/- रुपये किमतीचा ऐवज आहे. यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम असलेला एक स्टीलचा डबा, ५००/- रुपये असलेली काळ्या रंगाची पर्स (त्यात ५०० रुपयांची नोट आणि इतर कागदपत्रे), तसेच पांढऱ्या रंगाचा रिअलमी कंपनीचा सी-पिन चार्जर यांचा समावेश आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भोसले यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी २६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.२९ वाजता घटनेची नोंद घेतली असून, गु.आर.नं. १२१/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कायदा ३०३(२) नुसार अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.