
साखरीनाटेत शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला
राजापूर
तालुक्यातील साखरीनाटे परिसरात एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवला. सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या काही जागरूक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मुलीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. मात्र या घटनेमुळे साखरीनाटे परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास साखरीनाटे येथील हुना मास्तर रस्त्यावरून शाहीन उमीद गडकरी शाळेत जात असताना नाटे सडापेठ भागातील लोहार दुकान ते अस्मिता पतपेढी या मार्गावर अचानक ९ ते १० भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी तिला वेढा घालून चावा घेण्याचा प्रयत्न केला. या अचानक हल्ल्यामुळे ती घाबरून धावत सुटली. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका बाणे यांनी प्रसंगावधान राखत आपल्या छत्रीच्या सहाय्याने कुत्र्यांना हाकलून बाजूला केले. त्याचवेळी परिसरातील काही महिलांनी धाव घेत तिला तत्काळ मदत केली व तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुरक्षित सुटका केली. ही घटना केवळ एका विद्यार्थिनीपुरती मर्यादित नसून संपूर्ण परिसरातील शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व सामान्य जनतेसाठी एक गंभीर इशारा आहे. सध्या साखरीनाटे परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके रस्त्यांवर फिरताः आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवताना शक्यतो त्यांच्यासोबत एक जबाबदार व्यक्ती पाठवावी.
शाळेतील शिक्षक कर्मचारीवर्गान व विद्यार्थ्यांच्या ये-जा वेळेस विशेष सतर्कता बाळगावी. स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. यापूर्वीही ग्रामपंचायत साखरीनाटे यांच्याकडे नागरिकांनी अर्ज करून भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची माहिती दिली होती. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असे सांगण्यात आले. परिणामी अशा धोकादायक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. गंभीर घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा भविष्यातील दुर्घटनांना आळा घालण्यासाठी वेळेवर प्रभावी पावले उचलणे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.