
ढासळलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करा
खासदार संजय राऊतः लांजा-राजापूर येथील शिष्टमंडळाबरोबर चर्चा
लांजा: रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसैनिकांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारावर निष्ठा आहे. मात्र गद्दारीमुळे हे वैभव ढासळलेले आहे; परंतु खचून जाऊ नका. जिल्ह्यात पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. विकासकामांसाठीचा निधी संघटनेच्या माध्यमातून दिला जाईल, असे आश्वासन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लांजा-राजापूर तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले.
लांजा व राजापूर तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाला विकास निधी मिळण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी व विकासकामासाठी आवश्यक तेवढा निधी देण्याचे ठोस आश्वासन संजय राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, माजी जिल्हा संपर्क तथा रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग उपळकर यांनी मतदारसंघातील विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
तसेच लवकरच निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, ओबीसी अध्यक्ष पांडुरंग उपळकर, विधानसभा संघटक रामचंद्र (तात्या) सरवणकर, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड, राजापूर तालुका प्रमुख मुंबई बबन सकपाळ, सह संपर्क प्रमुख नामदेव नार्वेकर, पाचल विभाग प्रमुख विलास नारकर उपस्थित होते. खासदार राऊत यांनी स्वतःहून विकासकामासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले.
चौकट
खासदार संजय राऊत राजापूरला येणार ?
तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड, विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र (तात्या) सरवणकर यांनी खासदार संजय राऊत यांना राजापूरला भेट देण्यासाठी आग्रह केला. त्यावर त्यांनी आपण नक्कीच लवकरच तारीख निश्चित करून कळवतो असे सांगितले. त्यामुळे लांजा-राजापूर मतदारसंघातील ठाकरे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.