
रत्नागिरीच्या भाट्ये खाडीत अग्नितांडव
1 बोट जळून खाक, लाखोंचे नुकसान
रत्नागिरी: सध्या कोकणात सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे समुद्रातील मासेमारी थांबलेली असताना, रत्नागिरी येथील भाट्ये खाडीत नांगर टाकून ठेवलेल्या एक बोटीला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे बीट पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात मच्छिमारांचे लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. तसेच शेजारी उभी असलेली बोलेरो ही जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारी बंद असल्याने मच्छिमार आपल्या बोटी खाडीत किनाऱ्यालगत नांगर टाकून बांधून ठेवतात. याच बोटींपैकी एका बोटीला अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आणि ज्वलनशील पदार्थामुळे आगीने लगेचच रौद्ररूप धारण केले आणि शेजारी असलेल्या दुसऱ्या बोटीनेही पेट घेतला. मात्र ती किरकोळ जळाली.
या आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत बोटींचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेमुळे मासेमारीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मच्छिमारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. रत्नागिरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आगीचे कारण शोधून काढण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.