
जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनानिमित्त रॅली
रत्नागिरी, :- जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनोज पाटणकर यांनी केले.*
यावेळी सरकारी कामगार अधिकारी रविराज कदम, जिल्हा परिविक्षा अधिकारी आतिष शिंदे, परिविक्षा अधिकारी अनिल माळी, जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य प्रिया लोवलेकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृध्दी वीर, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक अन्वी शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कायदासाथी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी 11 वाजता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथून रॅलीचा प्रारंभ झाला. कुलकर्णी कंपाऊंड येथून धनजी नाका, मारुती आळी, गोखले नाका ते सावरकर चौक येथे समाप्त करण्यात आली.
‘ बंद करा बंद करा बालमजुरी बंद करा, बालमजुरी सोडा शिक्षणाशी नाते जोडा’, यासारख्या घोषणा देत अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कायदासाथी यांनी बाजार परिसरामध्ये जागरूकता निर्माण केली. बालकामगारास आर्थिक, कौटुंबिक किंवा सामाजिक कारणामुळे कोवळ्या वयातच अर्थाजनाची कास धरावी लागते. या प्रश्नाकडे केवळ कायद्याखालील तरतूदी व त्याअंतर्गत असलेल्या उपाय योजनापुरते मर्यादित दृष्टीने न पाहता बालमजुरी प्रश्नाच्या निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता व त्या समस्येकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे.आपणास कोठेही बालमजूर आढळल्यास चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. पाटणकर यांनी केले.
बाल कामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम १९८६ अधिसूचना व सुधारित अधिसूचना २०१६ नुसार सर्वच व्यावसायिक व प्रक्रियांमध्ये १४ वर्षाखालील बालकास काम करावयास प्रतिबंध आहे.
१४ वर्षांखालील बालकास धोकादायक व अधोकादायक उद्योगधंद्यामध्ये कामावर ठेवल्याचे आढळल्यास २० हजार रुपये दंड तर एक वर्षाची जबर शिक्षा कायद्यात आहे. १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवल्यास दुकान मालकावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यानुसार सहा महिने व दोन वर्षापर्यंत शिक्षा व 20 ते 50 हजार रुपये दंड किंवा दोन्ही स्वरूपाची शिक्षा अशी तरतूद आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनामध्ये बालमजूर ठेऊ नये, असे आवाहन श्री. पाटणकर यांनी केले.