
दस्त नोंदणीत फसवणूक झाल्यास फौजदारी गुन्हा
रत्नागिरी
मयत व्यक्ती जिवंत आहे असे भासवून वेगळ्याच व्यक्तीला उभे करत खरेदी खतासारखे दस्तऐवज नोंदवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा फसवणूक प्रकरणामध्ये यापुढे ७ दिवसात फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
दस्तनोंदणी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून नागरिक व शेतकरी यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी धोरण निश्चिती करण्यात आली आहे.
या संदर्भात राज्याच्या महसूल व वनविभागाने एक शासन निर्णय जारी केला आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, एक राज्य एक नोंदणी या कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर दस्त नोंदणी केली जाते. या नोंदणीमध्ये अनियमितता तसेच गैरव्यवहार होत असल्याचे आढळून आले आहे. दस्तनोंदणी करताना बनावट व्यक्तीला उभे करून स्वाक्षरी घेणे मृत व्यक्तीस जिवंत असल्याचे दाखवून नोंदणी करून घेणे, प्रकल्पालगतच्या जमिनी शेतकऱ्याची फसवणूक करून खरेदी
विक्री करणे, कुटुंबातील मालमत्तेचे हिस्से निश्चित झालेले नसताना एका भांवाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे यासारखे गैरव्यवहार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. याशिवाय सामायिक मालकीच्या इमारतीतील एकाच हिस्सेदाराने डीड करणे, रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामातील फ्लॅटस् व प्लॉट विक्री करणे, ७/१२ वर इतर अधिकारात सरकारचे नाव असताना दस्त नोंदणी करणे, भूसंपादनाचे सरकारी शिक्के पडलेले असताना दस्त नोंदणी करणे, धर्मादाय संस्थांच्या मिळकती विकणे, देवस्थान जमिनींचे बेकायदा दस्त करणे अशा गैरबाबी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत.