
मुंबईत सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षाचा मुलगा निघाला साताऱ्याला
पोलिस कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे हरवलेला मुलगा पनवेल पोलिसांच्या ताब्यात
मंडणगड: पोलिस ठाण्याचे कर्मचारी दत्तात्रय पिसाळ यांनी ३ जून २०२५ रोजी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मूळचा साताऱ्याचा असलेला आणि पनवेल येथे वाट चुकलेला एक मुलगा सुखरूपपणे पनवेल पोलिसांच्या ताब्यात पोहोचला. त्यानंतर पनवेल पोलिसांनीही या मुलाच्या सातारा येथील पालकांचा शोध घेऊन त्याला त्यांच्या स्वाधीन केले.
पोलिस कर्मचारी दत्तात्रय पिसाळ हे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सुरक्षा ताफ्यात कार्यरत आहेत. ३ जून रोजी आपली एस्कॉर्ट ड्युटी संपवून ते मुंबईहून मंडणगड येथे परत येत असताना ही घटना घडली. पिसाळ मुंबईहून मंडणगडकडे परतत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस रस्त्यावर उभे होते. त्यावेळी त्यांना एक मुलगा एक्स्प्रेस रोडने चालत जाताना दिसला. या रस्त्यावर दुचाकी वाहने आणि पादचाऱ्यांसाठी मार्ग नसतानाही तो मुलगा चालत असल्याने त्यांना शंका आली. त्यांनी मुलाची चौकशी केली असता, तो रडू लागला.
श्री. पिसाळ यांनी अधिक चौकशी केली असता, त्याचे नाव सनी निलेश मोरे (वय १२, रा. ऐरोली, मुंबई) असे असल्याचे समजले. तो घरात कोणालाही न सांगता निघाला होता आणि साधारणपणे ४२ किलोमीटर पायी चालत आला होता. त्याला त्याच्या आई-वडिलांचा मोबाईल नंबर आठवत नव्हता. तो त्याच्या सावत्र आई आणि वडिलांकडे राहत होता, तर त्याची सख्खी आई आणि आजी सातारा (वेण्णा नगर) येथे राहतात. तो आपल्या आई आणि आजीकडे जाण्यासाठी पायी निघाला होता. पिसाळ यांनी तात्काळ डायल ११२ वर फोन करून संबंधित मुलाची माहिती दिली. तसेच, ११२ चे पोलिस हवालदार श्री. महाजन, महामार्ग पोलिस, पळस्पे, पनवेल यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी मुलाला सुपूर्द केले.