
चाकरमान्यांचे ‘गणपती स्पेशल’ कडे लक्ष
२३ जूनपासून आरक्षण खुले : नियमित गाड्या होतात फुल्ल
खेड: यावर्षी २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. त्यामुळे २३ जूनपासून आरक्षण खुले होणार आहे. गणेशोत्सवातील कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण काही मिनिटांतच हाऊसफुल्ल होऊन प्रवाशांचा हिरमोड होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्या जाहीर केलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे नियोजन करणे सुलभ होणार आहे. आता चाकरमान्यांच्या नजरा गणपती स्पेशल गाड्यांकडे खिळल्या आहेत.
तुतारी एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस, मुंबई-मंगळूर या गाड्यांची गणेशोत्सवातील आसनक्षमता आरक्षण खुले होताच काही मिनिटांतच संपते. यामुळे गाड्यांच्या शेकडो प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरच राहावे लागते. रेल्वे प्रशासनाने ६० दिवस आधी आरक्षणाची तारीख जाहीर केली असली तरी गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही.
मुंबई-चिपळूणदरम्यान स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन गणेशभक्तांना दिलासा द्यावा, असा आग्रह धरला आहे याशिवाय रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्यादृष्टीने सकारात्मक निर्णय घ्या, अशी मागणीही होत आहे. रेल्वे प्रशासन आरक्षणानंतरच एकामागोमाग एक गणपती स्पेशल गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करत गणेशभक्तांना सुखद धक्का देते.