
नूतन पोलीस अधीक्षकांनी कार्यभार स्वीकारताच पोलीस दलात बदल्यांचा सिलसिला
अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेले अधिकारी, कर्मचारी धास्तावले
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामध्ये दिनांक २८ आणि २९ मे २०२५ रोजी सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वार्षिक सर्वसाधारण बदल्या पार पडल्या.
या बदल्यांची प्रक्रिया जिल्हा स्तरावर गठीत करण्यात आलेल्या आस्थापना मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात आली. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी कार्यभार सांभाळला. त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड आणि प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती. राधिका फडके यांनी सदस्य म्हणून काम पाहिले, तर प्रभारी कार्यालय अधीक्षक श्रीमती. श्रद्धा तळेकर यांनी सदस्य सचिव म्हणून भूमिका बजावली
.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या समक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बदल्या अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि समुपदेशनाद्वारे पार पडल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी दिलेल्या पसंतीक्रमांचा प्रशासकीय दृष्ट्या विचार करून आस्थापना मंडळाने अंतिम निर्णय घेतला, आणि त्यानुसार तात्काळ प्रभावाने बदल्या करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये प्रशासकीय कारणास्तव ३० सहायक पोलीस फौजदार, ७२ पोलीस हवालदार, ४ पोलीस नाईक आणि ११३ पोलीस शिपाई यांच्या बदल्या झाल्या आहेत. तसेच, चालक संवर्गातील १५ पोलीस हवालदार, १ पोलीस नाईक आणि ११ पोलीस शिपाई यांच्या बदल्या करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, आंतरजिल्हा बदल्यांमध्ये १ पोलीस हवालदार, २ पोलीस नाईक आणि ९ पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.