
लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य: एसपी बगाटे
रत्नागिरी : पोलिसांची लोकाभिमुखता वाढली पाहिजे आणि लोकांमध्ये मिसळून काम करणे हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे नवे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले. बगाटे यांनी २४ मे रोजी पदभार स्वीकारला आणि आज त्यांनी पहिलीच पहिली पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पोलीस शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि नम्र असावेत, तसेच त्यांनी लोकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद द्यावा, या गोष्टींना माझे प्राधान्य असेल. सागरी सुरक्षा दल सक्रिय करण्यात येईल. मच्छिमार बांधव आमचे कान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती गोळा केली जाईल. अमली पदार्थविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल. या प्रकारचे गुन्हे वारंवार करणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जाईल. कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवलेल्या दुचाकी वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल. महामार्गाच्या कामाचे डंपर बेदरकारपणे चालवले जात असल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल. स्पीड लॉकही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.