रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडून महामार्ग व पूरग्रस्त भागाची केली पाहणी
रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर, पूल, रस्ते यांची मा. श्री. एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी पाहणी करून संबंधित विभागांना सुरक्षिततेच्या दृष्टीने व धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करणे बाबत योग्य त्या सूचना दिल्या. तसेच तहसील कार्यालय लांजा येथील नियंत्रण कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. लांजा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सून काळात घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करुन योग्य त्या सूचना दिल्या.
तसेच मा. श्री. एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आज तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेऊन राजापूर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला तसेच
धोकादायक, दरडप्रवण क्षेत्रात, व पूर परिस्थितीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या, त्याचप्रमाणे राजापूर शहरातील पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली .