
कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाकडून जिल्ह्यात मॉक ड्रील यशस्वी
प्रशासनाबरोबरच मोठ्या उद्योग आस्थापनांचाही सहभाग
रत्नागिरी, : रत्नागिरी तहसिल कार्यालय, संगमेश्वरमधील हातिव ग्रामपंचायत आणि दापोलीमधील दाभोळ ग्रामपंचायत, राजापूर नगरपालिका यासह जेएसडब्लू पोर्ट, आंग्रे पोर्ट, फिनोलेक्स पोर्ट, अल्ट्राटेक कंपनी या प्रमुख 4 कंपन्या, रेल्वे स्टेशन, अशा विविध ठिकाणी जिल्ह्यात कोणतीही अफवा न पसरता प्रशासनाकडून यशस्वी मॉक ड्रील पार पडले. जलद कृतीदल, पोलीस दल, आपदा मित्र, आपदा मित्र, नागरी संरक्षण दल, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, एनसीसी कॅडेट, आरोग्य विभाग, नगरपालिका अग्नीशामन दल, जिल्हा प्रशासन आदींचा यामध्ये सहभाग होता.
दुपारी ठिक 4 वाजता रत्नागिरी तहसील कार्यालयात बॉम्ब पडल्याचा दूरध्वनी संदेश पोलीस, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष यांना देण्यात आला. तहसिलदार कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर धुराचे लोट बाहेर पडत होते. यावेळी सायरन वाजविण्यात आला. याचवेळी या इमारतीसमोरही दोन बाँब फुटले. ही आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन, एनसीसी पथक, पोलीस दल, शीघ्र कृती दलाचे जवान, आपती व्यवस्थापन विभाग, आपदा मित्र नागरी संरक्षण दल स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना जवानांनी बाहेर काढत रुग्णवाहिकेमध्ये दाखल केले. त्याचबरोबर अन्य कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त आलेल्या अभ्यागत नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी आणले.
पोलीस अधिकाऱ्यांकडून, ‘कोणतीही अफवा पसरवू नये. पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन पाठीशी असून, सर्वांना सुरक्षित स्थळ हलविण्यात येत आहे. जखमींना रुग्णवाहिकेमधून हलविण्यात येत असल्याचा, संदेश ध्वनीक्षेपकावरुन देण्यात येत होता. याचवेळेला जखमींना रुग्णवाहिका उपचारासाठी घेऊन जात होती. यामध्ये वैद्यकीय पथकाचा समावेश होता.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री केली. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, केंद्र शासनाने दिलेल्या
निर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करुन आजचे मॉक ड्रील यशस्वी करण्यात आले. या मॉक ड्रीलमध्ये गतीने नागरिकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळ हालविण्यात आले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. देशावर ज्या ज्या वेळी संकट येईल त्या त्या वेळी नागरिक आपली जबाबदारी पार पाडतात. आजच्या मॉक ड्रीलमध्ये कोणतीही अफवा न पसरता ते यशस्वी पार पाडण्यात आले. यामध्ये सहभागी असणाऱ्या पोलीस दल, आरोग्य यंत्रणा, नगरपालिका, एनसीसी, आपदा मित्र या सर्वांचे सहभाग लाभला.
पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, आज झालेल्या मॉक ड्रीलमध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये निश्चितपणे सुधारणा केली जाईल. शासनाच्या सहभागी सर्व विभागांचे आभार मानतो. मिळालेल्या कॉलला चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी त्याशिवाय मोठ्या पोर्टवरही त्यांच्या स्तरावर मॉक ड्रीन घेण्यात आले. मोठ्या औद्योगिक आस्थापनेमध्येही मॉक ड्रील घेण्यात आले. जिल्हा आपत्ती नियत्रण कक्षातून 403 गावांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली राबविण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, पोलीस उपअधीक्षक निलेश माईंनकर आदींचा यात सहभाग होता.