
वाशिष्ठी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू
सावर्डे
कपडे धुण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील एका लहान मुलाचा पाय घसरून नदीच्या डोहात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या त्याची आई आणि आत्या यांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना आज सकाळी ११ वाजता चिपळूण तालुक्यातील आलोरे शिरगाव पोलीस ठाणे हद्दीतील खडपोली रामवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या डोहात घडली.
या दुर्घटनेत रेणुका धोंडीराम शिंदे (वय ४५, राहणार रामवाडी, मूळ पिंपळी खुर्द), लता कदम (३५, राहणार पिंपळी वरची वाडी, रेणुका शिंदे यांची भाची) आणि लक्ष्मण शशिकांत कदम (८, राहणार पिंपरी वरची वाडी) यांचा मृत्यू झाला. पूजा धोंडीराम शिंदे (वय १५, रेणुका शिंदे यांची मुलगी) या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून ती सुखरूप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि कदम कुटुंबीय आज सकाळी रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहावर कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी लहान मुलगा लक्ष्मण काठावर बसून खेळत असताना, नदीतील शेवाळामुळे त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. मुलाला बुडताना पाहून त्याची आई लता कदम तत्काळ त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याही बुडू लागल्या. या दोघांनाही वाचवण्यासाठी रेणुका शिंदे यांनी पाण्यात उडी घेतली, परंतु त्याही पाण्यात बुडाल्या.
काठावर बसलेली पूजा शिंदे यांनी आरडाओरड केली, परंतु जवळपास कोणी नसल्याने तिने तिचा सख्खा भाऊ शुभम शिंदे (वय २०) याला फोन करून घटनेची माहिती दिली. शुभम आणि त्याचा मावस भाऊ सचिन कुंभार (वय २५) हे चिंचघरी येथील वीटभट्टीच्या कामावरून तातडीने घटनास्थळी पोहोचले. दोघांनी मिळून तिन्ही बुडालेल्या व्यक्तींना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता.
सदर वाशिष्ठी नदीचा डोह १२ ते १४ फूट खोल असून, या ठिकाणी नदीचे पाणी वाहत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र कुमार राजमाने आणि आलोरे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भरत पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेहांचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.