
रत्नागिरीचे 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित
रत्नागिरी: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील 20 पर्यटक श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली.
रत्नागिरीतून कुणाल देसाई यांच्यासह एकूण 20 जण श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेले होते. कुणाल देसाई हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्यवसाय उपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या क्लिनिकमधील कर्मचारी वर्ग देखील आहेत.
जम्मू-काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील या पर्यटकांबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने हालचाल करत कुणाल देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी देसाई यांनी सर्व पर्यटक सुरक्षित असून ते श्रीनगरमध्ये ठीक असल्याची माहिती दिली.