
आंबडस बंधारा दुरुस्तीसाठी साडेचार कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता
चिपळूण :- कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत खेड तालुक्यातील आंबडस येथील कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामाच्या ४ कोटी ३३ लाख ४० हजार ८८६ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास शासनाच्या जलसंपदा विभागाने नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती व नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पाणीसाठा होऊन उपसा सिंचनाद्वारे खेड तालुक्यातील आंबडस, केळणे, काडवली व चिपळूण तालुक्यातील पाली या गावातील १२० हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. याचा येथील शेतकऱ्यांना फायदा होणार असून याबाबत या गावांमधील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबडस गावातील वाशिष्ठी नदीच्या उपनाल्यावर १९७४ मध्ये दगडी बांधकामात बंधारा बांधण्यात आलेला आहे. बंधाऱ्याचा एकूण पाणीसाठा ०.८२१ द. ल. घ. मी. पर्जन्योत्तर प्रवाहासह एकूण पाणीसाठा १. २१७ द. ल. घ. मी. इतका आहे बंधाऱ्याची एकूण लांबी १२२ मीटर असून त्यास एकूण ३५ स्तंभ व ३६ गाळे आहेत. या कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याचे लाभक्षेत्र १२० हेक्टर इतके असून खाजगी उपसा सिंचनाद्वारे खेड तालुक्यातील आंबडस, केळणे, काडवली व चिपळूण तालुक्यातील पाली या गावातील क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे.
कोकण पद्धतीच्या बंधाऱ्याचे बांधकाम दगडी बांधकामात असून बंधाऱ्याच्या बांधकामामधून व पायातून मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बंधाऱ्यात पाणीसाठा होत नाही. बंधाऱ्याच्या पायातील दोन्ही बाजूच्या दगडी बांधकामाचा व गाळ्याच्या खांबाच्या बांधकामाचे मॉर्टर निघून गेल्याने व झाडे झुडपे वाढल्यामुळे बांधकामाचे सांधे निखळले व खिळखिळे झालेले आहेत. या बंधार्यावरील आरसीसी स्लॅबचा पृष्ठभाग ओबड धोबड झाला असून उजव्या बाजूच्या २० खांबापुढील स्लॅब तुटलेला आहे. या स्लॅब मधील लोहसळई तळाखालच्या बाजूने उघड्या पडलेल्या असून त्यास गंज लागलेला आहे. या बंधाऱ्यांमध्ये सन २००२-०३ पासून पाणीसाठा होत नाही. या अनुषंगाने बंधाऱ्याच्या सुरक्षितेच्या दृष्टीने दुरुस्ती होणे आवश्यक असल्याने कोकण पद्धतीच्या बंधारा आंबडस, ता. खेड, जि.- रत्नागिरी या योजनेच्या दुरुस्ती कामास विशेष दुरुस्ती अंतर्गत ४ कोटी ३३ लाख ४० हजार ८८६ रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दिली आहे.
तांत्रिक मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया होऊन खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होईल
याबाबत येथील लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता विपुल खोत यांच्याशी संपर्क साधला असता आंबडस येथील कोकण पद्धतीने बंधारा दुरुस्तीसाठी सुमारे साडेचार कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. तर आता तांत्रिक मंजुरी नंतर निविदा प्रक्रिया या साऱ्या बाबींना काही महिने लागतील, असे स्पष्ट केले. यानंतरच खऱ्या अर्थाने पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आंबडसचे सरपंच नितीन मोरे यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.