स्वरूपानंद पतसंस्थेची सातत्यपूर्ण कामगिरी; ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने रत्नागिरीच्या अर्थकारणात सातत्याने ३४ वर्ष प्रगतीशील आर्थिक व्यवहार करत आपलं अर्थविश्व व्यापक बनवत नेत विश्वासार्ह पतसंस्था म्हणून जनमानसात स्थान निर्माण केलेले आहे. ८४ हजार ठेव खाती हे संस्थेच्या विश्वासहार्यतेचे प्रतिक म्हणावे लागेल.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आर्थिक शिस्त कमालीची जपली. त्यातूनच ‘विश्वासार्ह पतसंस्था’ अशी ओळख स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची निर्माण झाली. संस्थेने आपल्या व्यवहारात कमालीचे सातत्य ठेवले, कमालीची प्रमाणबद्धता राखली त्यामुळे संस्थेचे अर्थकारण दिवसेंदिवस ताकदवान होत गेले.
वसुली व कर्ज वितरणामधील समतोलामुळे नेट N.P.A 0%
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची आर्थिक वैशिष्ट्य सांगायची झाली तर जेव्हापासून म्हणजे २००८-०९ पासून २०२४-२५ पर्यंत म्हणजे गेली १७ वर्षे नेट N.P.A. 0% राखण्यात संस्था यशस्वी झाली आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कटाक्षाने वसुली करण्याची यंत्रणा त्याहीपेक्षा अधिक डोळसपणे केलेले कर्ज वितरण याचे महत्त्व या ठिकाणी अधोरेखित होते.
उत्तम वसुली व्यवस्थापन
सलग सातत्याने कर्ज वितरण वाढवत नेत असताना आज अखेर २५ हजार कर्ज खाती सुरु असताना संस्थेने गेली १७ वर्षे उत्तम वसुली व्यवस्थापन करून 0% नेट N.P.A. ठेवला. ही गोष्ट संस्थेतील अर्थकारणाचं यश अधोरेखित करते. नेट N.P.A. 0% ठेवतानाच ९९% च्या वर वसुली करण्याचं काम संस्थेने केले आहे. यावर्षी ९९.७१% कर्ज वसुली करण्यात आली. ही किमया साधताना संस्थेच्या ८ शाखांनी १००% वसुली केली आहे.
निधीचे योग्य वितरण व वसुली यामुळे सलग वाढता नफा
आपल्या निधीचे योग्य वितरण व वसुली तसेच योग्य बँकांत गुंतवणूका करून संस्थेने उत्तम परतावा प्राप्त करून आपली आर्थिक ताकद वाढवत नेली आहे. सन २०१३ मध्ये संस्थेचा निव्वळ नफा प्रथम १ कोटींचा झाला तेथपासून सलग १२ वर्षे संस्थेने उत्तम आणि वाढता नफा प्राप्त केला असून आता २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेला ८ कोटी ३२ लाखांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे.
उत्तम आर्थिक स्थिती
संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती दर्शवण्यासाठी वसुली, N.P.A. प्रमाण, संस्थेचा निव्वळ नफा या गोष्टी दिशादर्शक मानल्या जातात आणि स्वामी स्वरूपानंदने ९९.७१% वसुली 0% N.P.A. सलग १७ वर्षे राखत एक विक्रमी काम केले असतानाच गेली १२ वर्षे १ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक नफा प्राप्त करत असताना ४८ कोटींचा भक्कम स्वनिधी निर्माण केला असून १४९ कोटींच्या बँक गुंतवणूका केल्या असल्याने ठेवीदारांच्या ठेव सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगला अर्थकोट निर्माण केला असल्याने संस्थेची विश्वासार्ह प्रतिमा हे मोठे शक्तीस्थान बनले आहे, अशी माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.