
मौजे असुर्डे येथील ओढ्यात मृत खेकड्यांचा खच
परिसरात उलटसूलट चर्चाना वेग
संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे या ठिकाणी असलेल्या ओढ्यातील पाण्यात मृत खेकडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कोणत्या कारणाने खेकडे मेले आहेत, याचे कारण समजू शकले नसले तरी याची उलटसुलट चर्चा मात्र सर्वत्र सुरु आहे.
मौजे असुर्डे बौद्धवाडी येथील प्रदीप मोहिते यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर वाहत्या पाण्याचा महालक्ष्मी नावाने ओळखला जाणारा ओढा आहे. या ओढ्याच्या ठिकाणी प्रदीप मोहिते हे गेले असता त्यांच्या नजेरेस सुरुवातीला मेलेले एक-दोन खेकडे दिसून आले. याकडे त्यांनी गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केले. मात्र पुढे त्यांना अजून काही प्रमाणात नुसतेच मेलेले व काही दिवसांपूर्वी मेलेले असे खराब झालेले खेकडे दिसून आल्याने “कुछ तो गडबड हैं” हे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी ओढ्यातून काही अंतरापर्यंत चालत जाऊन पाहणी केली असता अनेक मृत खेकडे त्यांना दिसून आले. याबाबतची प्रथम माहिती त्यांनी गावचे प्रथम नागरिक असलेले सरपंच प्रदीप शिंदे यांना दिली. परिसरात सुद्धा याची चर्चा झाली आणि एकच खळबळ उडाली. काही लोकांनी सुद्धा येऊन याची खात्री केली. हे खेकडे कशामुळे मृत झाले असावेत याबाबत प्रत्येकजण आपापल्या परीने तर्कवितर्क लढवायला लागले. खेकड्यांची शिकार करण्यासाठी विषारी औषध पाण्यात सोडले असावेत असाही अंदाज चर्चेतून बाहेर पडत होता.
कोणीतरी अज्ञाताने खेकडे पकडण्यासाठी विषारी औषध टाकण्याचा प्रकार केला असावा, अशा चर्चेला अधिक जोर मिळाला असून, जर विषारी औषधचा वापर करण्यात आला असेल तर मात्र या अघोरी प्रकारचा नाहक फटका येथील ओढ्यातील पाणी पिऊन तहान भागवण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाळीव मुक्या जनावरांसह रानटी पशु पक्ष्यांच्या जीवावर बेतू शकण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची भीती असून शेतकऱ्यांनी याचा मोठा धसका घेतला आहे.
.