
भाई विलणकर, सदानंद भागवत यांना पुरस्कार
चित्पावन मंडळ ; विविध पुरस्कारांचे वर्धापनदिनी गुरुवारी वितरण
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा समाजभूषण पुरस्कार देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांना आणि जीवनगौरव पुरस्कार कबड्डी, कुस्ती, शरीरसौष्ठव या क्रीडाप्रकारात दबदबा निर्माण करणारे ८० वर्षांचे श्रीकृष्ण तथा भाई विलणकर यांना जाहीर झाला आहे.
मंडळाच्या ९२व्या वर्धापनदिनानिमित्त येत्या गुरूवारी (ता. २७) रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मंडळाच्या जोशी पाळंद येथील भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम होईल. प्रमुख पाहुण्या डॉ. प्रज्ञा गोखले तसेच मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, उपाध्यक्ष स्मिता परांजपे, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
(कै.) सुधा वसंत बडे पुरस्कार तिघींना देण्यात येणार आहे. सन्मानपत्र, साडी, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विश्व हिंदू परिषदेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुवर्णा वैशंपायन, अभिनेत्री, कृषी उद्योजिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी, राजापूरच्या डॉ. नेहा करंदीकर-जोशी यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार शालेय संस्कृत व्याकरणच्या लेखिका दीप्ती आगाशे यांना प्रदान करण्यात येणार आहे. समशेरबहाद्दर पुरस्काराचे गुरूवर्य दादोजी कोंडदेव शाळा (तासगाव, सांगली) येथील बेस्ट कॅडेट सार्थक पाटील याला दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सहा हजार रुपये, सन्मानपत्र असे आहे. सेवागौरव पुरस्कार पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळात ४२ वर्षे सेवा देणारे धनंजय देशमुख यांना दिला जाईल.
प्रमुख पाहुण्या डॉ. प्रज्ञा गोखले, सीए मयुरी वैद्य, शुभदा साठे, सीए संकेत परांजपे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते संजय जोशी, राकेश नलावडे, चंद्रकांत राऊळ, कौस्तुभ सावंत व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. (कै.) ल. वि. केळकर विद्यार्थी वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी अमोल मुळ्ये व (कै.) आनंदीबाई केळकर विद्यार्थिनी वसतीगृहातील आदर्श विद्यार्थिनी आर्या दाते हिला दिला जाईल.
—-
शौर्य पुरस्कार
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार दोनजणांना प्रदान केला जाणार आहे. प्रत्येकी ४ हजार रुपये, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पहिली मानकरी पाचवीत शिकणारी गिर्यारोहक ग्रिहिथा विचारे (मुळची गुहागर येथील, सध्या सरस्वती विद्यालय, घोडबंदर, ठाणे) हिला देऊन गौरवण्यात येणार आहे. दुसरे मानकरी आतापर्यंत १२५ गडकिल्ले सर करत निसर्ग भटकंती करणारे प्रथमेश वालम (पडवे, गुहागर) यांना दिला जाणार आहे.