
ऐन परीक्षेच्या काळात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी; विद्यार्थ्यांसह पालक संतप्त
रत्नागिरी – येथील मारुती मंदिर ते मध्यवर्ती एसटी स्टँड या दरम्यान रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम चालू असल्याने मारुती मंदिर ते माळनाका आणि जयस्तंभ ते एसटी स्टँड अशी एकेरी वाहतूक चालू आहे. या एकेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत असून वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे.
सध्या इयत्ता बारावीसह इयत्ता दहावी एस एस सी च्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांची वेळ सकाळी असून विद्यार्थ्यांचे काही पेपर दुपार सत्रातही आहेत. मध्यंतरीच्या काळात बंद ठेवलेले रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम ऐन परीक्षेच्या काळात पुन्हा सुरू केल्याने व यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा संयुक्त संस्कृत विषयाचा पेपरचा रिपोर्टिंग टायमिंग दुपारी २.३० चा असताना दुपारी २ ते २.१५ च्या दरम्यान मारुती मंदिर सर्कलला वाहतूक कोंडी झाल्याने आता वेळेत कसे जायचे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांचे सोबत असणा-या पालकांसमोर निर्माण झाला. शेवटी काही दुचाकीवरून विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या पालकांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला वळसा घालून थीबा पॅलेस रोड ते माळनाका असा प्रवास करुन परीक्षा केंद्र वेळेत गाठण्याचा प्रयत्न केला.
दहावी बारावी च्या परीक्षांसाठी काही विद्यार्थी आपल्या पालकांसोबत तर काही एसटी बस,रीक्षा इत्यादी वाहनांनी परीक्षा केंद्रावर येत असतात. रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे कामामुळे आणि एकेरी वाहतुकीमुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी व पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून मध्येच बंद ठेवलेले कॉंक्रिटीकरणाचे काम ऐन परीक्षेच्या काळात चालू ठेऊन वाहतूक खोळंबा होत असताना ठेकेदार आणि प्रशासन ढिम्म आहेत. मात्र परीक्षेच्या काळातील या वाहतूक कोंडीकडे येथील स्थानिक पुढारी आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.