
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे* *वीर सावरकर अभिवादन सायकल रॅली
शिरगाव येथेही खोलीचे घेतले दर्शन
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी बुधवारी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे लक्ष्मी चौक येथील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिरगाव गायवाडी येथे वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व दामले कुटुंबाने १०० वर्षे जतन करून ठेवलेल्या खोलीलाही भेट देण्यात आली. या दोन्ही उपक्रमांना क्लबमधील सायकलस्वारांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
अंदमानातून सुटका झाल्यानंतर कोणत्याही सक्रिय राजकारणात भाग घ्यायचा नाही, या बंधनावर स्वातंत्र्यवीर सावकरांना रत्नागिरीत राजकीय बंदीवान म्हणून आणण्यात आले. परंतु प्लेगची साथ आल्यामुळे सावरकरांना शिरगाव, गायवाडी येथील लोकमान्य टिळकांचे अनुयायी (कै.) विष्णूपंत काशिनाथ दामले यांनी शिरगावात बोलावले. दामले यांच्या घरी धान्याचे कोठार असलेली खोली रिकामी करून ती वीर सावरकरांना राहण्यासाठी देण्यात आली. आज ही खोली पाचव्या पिढीनेही जतन करून ठेवली असून नोव्हेंबर २०२४ मध्ये या खोलीला शंभर वर्षे पूर्ण झाली. या खोलीत सावरकरांची लेखणी, दिवा, हस्ताक्षराची प्रत आजही जतन करून ठेवण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती प्रसन्न दामले व रविंद्र दामले यांनी या वेळी सायकलिस्टना दिली.
मारुती मंदिर येथून अभिवादन सायकल रॅलीला सुरवात झाली. यावेळी इयत्ता सहावीतील सायकलपट्टूंसह ७३ वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ, तरुण, महिला सायकलपट्टू यात सहभागी झाले. लक्ष्मीचौक येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जवळच असलेल्या शिरगाव, गायवाडी येथे सायकलिस्ट रवाना झाले. त्यानंतर दामले यांच्या निवासस्थानी या खोलीला भेट देऊन तिथे अभिवादन करण्यात आले. दामले यांनी वीर सावरकरांच्या प्रती असलेली आदरभावना व्यक्त केली. या वेळी सायकलिस्ट व शास्त्रीय गायिका सौ. मुग्धा भट सामंत यांनी वीर सावरकर रचित नाटकातील जान वचना, बोला हे नाट्यपद सुरेल आवाजात सादर केले.
शिरगावातील हनुमान मंदिर मंदिराचे उद्घाटन व वीर सावरकरांनी रचलेले तुम्ही आम्ही सकल बंधू हिंदु हिंदु हे गीत याची कथा दामले यांनी सांगितले. याच खोलीमध्ये मार्च १९२५ मध्ये वीर सावरकर आणि रा. स्व. संघाचे संस्थापक हेडगेवार यांची भेट झाली. मद्रासचे प्रसिद्ध क्रांतिकारक ऋषीजी तथा ऋणा व्ही. व्ही. एस् अय्यर व सावरकरांची भेट झाली होती. देशातील पहिले संमिश्र हळदीकुंकू दामले यांच्या घरी झाले होते. जातीभेद व स्पृश्य- अस्पृश्य भेद दूर करण्याची चळवळ वीर सावरकरांनी शिरगावातून सुरू केल्याचे प्रसन्न दामले यांनी सांगितले.