
प्लास्टीक मुक्तीसाठी ८४६ ग्रामपंचायती सरसावल्या
रत्नागिरी: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांच्या नियोजनानुसार शंभर दिवस उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामधील ८४६ ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टीक मुक्त महाश्रमदान स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. सर्व तालुक्यातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, वर्दळ असणारी ठिकाणे, राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग या ठिकाणी काल (ता. १५) स्वच्छता करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने शंभर दिवस वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामध्ये स्वच्छता हा एक भाग आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टीकचा वापर वाढता आहे. त्यामुळे ठिकठिकाणी प्लास्टीक कचरा मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागापासून शहरांमध्ये त्याचे प्रमाण वाढलेले आहे. हा कचरा गोळा करून प्लास्टीकची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्हापरिषदेने महाश्रमदान मोहिम प्रत्येक ग्रामपंचायतीत राबविली आहे. त्यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी, महिला मंडळ, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटाच्या महिला तसेच शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी सहभागी झाले.
मिरजोळे, कुवारबाव व खेडशी ग्रामपंचायतीत मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी हजेरी लावली. त्यांनी हातामध्ये खराटा घेऊन स्वच्छताही केली. त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गट विकास अधिकारी जे.पी.जाधव सहभागी झाले होते. या मोहीमेमध्ये सहभागी नागरीक, विद्यार्थ्यांना स्वच्छता साहित्य दिले गेले होते. त्यात जमिनीवरील पडलेले प्लास्टीक काढण्यासाठी बांबूचे हत्यार, हँडग्लोज, सॅनिटायझर, प्लास्टीक संकलित करण्यासाठी गोणी (पिशव्या), पिण्याची पाण्याची व्यवस्था, चहा-नाश्ता, खाण्यासाठी लेमनच्या गोळ्या आदीची व्यवस्था सर्व ग्रामपंचायतींनी केली होती. प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी लोकांचे ८ ते १० संख्येचे गट तयार करुन सर्व ठिकाणची प्लास्टीक साहित्य गोळा करण्यात आले. त्यामध्ये प्रवासी, पर्यटक, वाहनधारक यांच्याकडून प्लास्टीक पिशव्या, बॉटल्स, वेफर्सची व बिस्कीटची पाकीटे (Wrappers) आदी प्लास्टीक कचरा गोळा करुन सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.
कोट
ग्रामपंचायतींनी गोळा केलेला प्लास्टिक कचरा प्रक्रिया करण्यासाठी सिध्दगिरी निसर्ग मित्र-स्वयंसेवी संस्था, अमर प्लास्टीक इंडस्ट्रिज, सोशल लॅब इनर्वामेंटल सोल्युशन या सामाजिक संस्था व कंपनीना दिला जाणार आहे. त्या प्लास्टिक कचऱ्यापासून गावागावांमध्ये स्वच्छता होईल आणि गावे स्वच्छ सुंदर दिसतील.
– किर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी