
मुंबई – गोवा महामार्ग सोळा वर्षांनंतरही अपूर्णच
रत्नागिरी
महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहीलेल्या समृद्धी महामार्गाचे काम सहा वर्षात पूर्ण झाले, मात्र मुंबई- गोवा महामार्गाचे काम 16 वर्षे झाली तरी अद्याप अपूर्णच आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा 701 कि.मी. चा असून तो सहा वर्षात पूर्ण झाला तर मुंबई-गोवा महामार्ग 471 कि.मी.चा असूनही सोळा वर्ष उलटली तरी पूर्ण झालेला नाही. समृद्धी महामार्ग सहा वर्षात पूर्ण होतो, मात्र मुंबई-गोवा महामार्गाला 16 वर्ष का लागतात, हा कोकणवासीयांचा प्रश्न आजही प्रश्नच राहिला आहे.
सध्या तर महामार्गाचं काम बाजूलाच राहिलं असून पहिलं टोलनाक्याचं कामच प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे.
गोवा महामार्गाच्या आरवली ते लांजा हा जवळपास 60 कि.मी.च्या महामार्गाचे काम रखडलं आहे. सध्या संथगतीने काम सुरू आहे. कोकण – विकासाच्या समृद्धीचे रडगाणे सोळा वर्षानंतरही गातच राहावे……! असे म्हणण्याची पाळी कोकणवासीयांवर आली असून अपेक्षा आणि स्वप्नांचा भंग झाला.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला दिरंगाई केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांना काढून नव्याने तिसर्या ठेकेदाराला काम दिले तरीही हे काम अपूर्णच आहे. संथगतीने चालणार्या या कामामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर अपघात झाले आहेत. या अपघातात अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी गेले आहेत. जनतेच्या रेट्यानंतर शासनाने संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. हा महामार्ग लवकर पूर्ण व्हावा यासाठी पत्रकार, विविध संघटना, राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे, उपोषणे, धरणे अशी अनेक आंदोलने केली आहेत. तरीही हा महामार्ग आजही अपूर्णच आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था महामार्गाची आहे. कोकणातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मागेच पडला असून कोकणवासियांना कित्येक वर्षांपासून न्याय मिळाला नाही. कोकणवासियांचा अंत सरकार आणखी किती दिवस पाहणार ? असा सवालही प्रवाशांतून विचारला जात आहे. सध्या निवळी येथील कोकजेवठार येथे टोलनाक्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. मात्र त्याच्याच शेजारी असलेले खड्डे सध्या जीवघेणे ठरत आहेत.