
शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी बंधनकारक
संगमेश्वर:- शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक शिधापत्रिका धारकाला ई केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे स्वस्त धान्य वितरणातील बोगस प्रकरणांना आळा बसणार आहे, असा दावा जरी करण्यात आला असला तरी संगमेश्वर तालुक्यात देशाबाहेर असणार्यांच्या ई केवायसी करण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षकांना ई केवायसी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्यांचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना कुटुंबनिहाय शिधापत्रिकेतील लाभार्थीची ई‚केवायसी पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थीच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.
स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई‚केवायसी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा एकमेव उद्देश आहे. अनेक कुटुंबांमध्ये मयत लाभार्थीच्या नावावर देखील धान्य वितरण केले जाते.संबंधित कुटुंबाकडून याबाबतची माहिती पुरवठा विभागाला दिली जात नाही. नव्या मोहिमेमध्ये प्रत्येक तालुक्यातील मयत लाभार्थी वगळले जातील व धान्य वितरणाचा लाभ इतर वंचित लाभार्थ्यांना मिळू शकेल.