
खोटे दाखलेप्रकरणी कडक कारवाई करा- भाजपा शिष्टमंडळ
रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील शिरगाव ग्रामपंचायतीमधून बांग्लादेशातील नागरिकांना बेकायदेशीरपणे वास्तव्याचा दाखला देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बाधा पोहोचवणारा आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र फाळके व माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर व शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भातील निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. यात म्हटले आहे की, यापूर्वीच रत्नागिरी बांग्लादेशातील नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य आपण नुकत्याच केलेल्या एका कारवाईमुळे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर खोटे दाखले देण्याची घटना अत्यंत गंभीर आहे. याही प्रकरणात हा दाखला देणाऱ्याविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच रत्नागिरीत अजूनही बांग्लादेशातील बेकायदेशीर नागरिकांचे वास्तव्य आहे का याचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत आहोत.
निवेदन देण्याकरिता भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर,जिल्हा चिटणीस सचिन करमरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुशांत चवंडे, माजी नगरसेवक राजू तोडणकर, उमेश कुळकर्णी, समीर करमरकर, सौ. मानसी करमरकर, , सत्यवती बोरकर, समीर विलणकर, पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.