
प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची तत्काळ अंमल बजावणी करा
रत्नागिरी मनसेची आक्रमक भूमिका
रत्नागिरी
रत्नागिरी शहरासाठी प्रलंबित असलेल्या घनकचरा प्रकल्पासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेने नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेवून निवेदन दिले. या प्रकल्पाची तत्काळ अंमलबजावणी करा नाहीतर मनसे ठिय्या आंदोलन करेल असा निर्वाणीचा इशाराही यावेळी दिला.
गेली दोन वर्ष रत्नागिरी शहरासाठी अत्यंत महत्वाच्या घनकचरा प्रकल्पाची निर्मिती व्हावी म्हणून मनसे सातत्याने पाठपुरावा करत आहे. यासाठी आज मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.रत्नागिरीतील जे के फाइल्स, साळवी स्टॉप , छत्रपती शिवाजी महाराज नगर आदी परिसरातील जनतेला डम्पिंग ग्राउंड वरील दुर्गंधी तसेच हवा प्रदुषणापासून कायम स्वरुपी मुक्ती मिळावी यासाठी या प्रकल्पाची नितांत गरज आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आश्वासन नगर परिषद प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले .
याप्रसंगी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रुपेश जाधव, तालुका सचिव अँड अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, महिला सेना तालुका सचिव सौ आकांक्षा पाचकुडे, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर , तेजस नागवेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.