
जिंदल कंपनीने गॅसची वाहतूक करणारे ट्रक पार्किंग अन्यत्र हलवावे
मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे यांची मागणी
रत्नागिरी
वायु गळतीमुळे जयगड माध्यमिक विद्यामंदिरमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्रास झाला असून जिंदल पोर्टने तेथील गॅसची वाहतूक करणारे ट्रक पार्किंग अन्यत्र स्थलांतरीत करावे अशी मागणी प्रशालेतर्फे जयगड पोलिसांसह पोर्टच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्याध्यापक प्रदीप वाघोदे यांनी पोलिस निराक्षकांकडे दिले आहे.
जयगड येथील जे. एस.डब्ल्यू. पोर्ट कंपनीचा माल आणि गॅस वाहतुकीचे पार्किंग यार्ड माध्यमिक विद्यामंदिर शाळेच्या समोर काही अंतरावर आहे. या पार्किंग यार्डमध्ये अगोदर कोळसा आणणारे ट्रक उभे केले जात होते. मात्र दोन वर्षापूर्वी कंपनीने गॅस वाहतूक सुरु केली. सध्या गॅस वाहतूकीचे ट्रक त्या पार्किंगमधून ये-जा करत आहेत. त्याचवेळी अत्यंत ज्वालाग्राही पदार्थांच्या गाड्या या यार्डमध्ये येत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेकडे तक्रारीही आलेल्या आहेत. याचे गांभिर्य ओळखून संस्थेने २२ डिसेंबर २०२२ रोजी जिंदल पोर्टच्या व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे तक्रार दिली होती. तसेच ट्रक शालेय परिसराजवळ उभे करु नयेत अशी सुचनाही केली होती. परंतू व्यवस्थापकांनी त्याबाबत काहीही उपयायोजना केलेल्या नाहीत. १२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास गॅस गळती झाल्यानंतर गॅसचा तीव्र वास शालेय परिसरात येऊ लागला. ही बाब कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविण्यात आली होती. त्या वासाचे प्रमाण तीव्र होत गेल्यामुळे मुलांना पोटात मळमळणे, डोके दुखणे, उलट्या होणे असे प्रकार होऊ लागले. त्यानंतर मुलांना उर्जा हॉस्पीटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले होते. परंतु मुलांन होणारा त्रास वाढत गेला. काही मुलांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तसेच गंभीर असलेल्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले गेले. खासगी रूग्णालयात ९ विद्यार्थी उपचार घेत होते. एकूण ७१ विद्यार्थ्यांना गॅसमुळे बाधा झाली होती. ही अत्यंत गंभीर आणि मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी आहे. संस्थेने यापुर्वी कंपनीकडे तक्रार केलेली असतानाही व्यवस्थापनाने उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे १२ डिसेंबर २०२४ रोजी हा वायुगळतीचा प्रकार घडला. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असून, संस्थेकड कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मुलांच्या तसेच गावांतील नागरीकांच्या भविष्याचा विचार करून कंपनी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी आणि गॅसच्या गाड्यां त्वरीत बंद कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांसह जिंदल पोर्टच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.