
हातखंब्यात टँकरची दुचाकीला पाठीमागून धडक, निवळीतील तरुणाचा जागीच मृत्यू
पाण्याचा टँकर म्हात्रे कंपनीचा
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दर्याजवळ पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली. शिशिर शांताराम रावणंग (36, निवळी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीला धडक देणारा टँकर हा म्हात्रे कंपनीचा असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच निवळी, रत्नागिरी येथील त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, शिशिर हा नुकताच एअरटेल कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला होता. शुक्रवारी रात्री 8.30 लांजा येथील आपले काम आटोपून तो निवळी येथील आपल्या घरी निघाला होता. यावेळी हातखंबा येथील दर्ग्याजवळ आला असता म्हात्रे कंपनीच्या पाण्याच्या टँकरने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत शिशिर दुचाकीवरून फेकला गेला. त्याला जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केला मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शिशिरच्या अपघाताची माहिती मिळताच निवळी आणि रत्नागिरी येथील नातेवाईकानी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. टँकर चालकाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे मागणी करण्यात आली. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.