
गॅस गळती प्रकरणात जिंदाल कंपनीतील चौघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी: गॅस गळती प्रकरणात कंपनीवर कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून तहसीलदारांनी कठोर पावले उचलली आहेत. जिंदाल कंपनीतील दोन व्यवस्थापक आणि दोन अभियंते यांच्यावर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गंगाधर बंडो पाध्याय, भाविन पटेल, सिध्दार्थ पटेल आणि दीप विटलानी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या चौघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, वायू गळतीमुळे प्रकृती बिघडलेल्या 69 जणांवर उपचार सुरु आहेत. दुर्घटनाग्रस्त सर्वांना नुकसान भरपाई जिंदाल कंपनीने देण्याची मागणीही करण्यात आली आहे. जिंदाल कंपनीमध्ये गुरुवारी एलपीजी वायू गळती होऊन परिसरात असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. एकूण 68 विद्यार्थी आणि एका महिलेची प्रकृती बिघडली. 61 जणांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून 8 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.