
मारुती मंदिर येथे मुख्यमंत्री शपथविधी जल्लोष सोहळ्याला उदंड प्रतिसाद
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ करून भाजपा महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले. या यशाचे शिल्पकार, लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित रंगारंग कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा सोहळा मारुती मंदिर येथे भाजपाच्या माजी नगरसेवकांनी भव्य स्क्रिनवर प्रक्षेपित केला. या सोहळ्यात ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. लाडू, मिठाई वाटप केली. रत्नागिरीकरांनी या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
मारुती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा निवडणूक समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी विधानसभा निवडणूक समन्वयक सचिन वहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुशांत उर्फ मुन्ना चवंडे, जिल्हा चिटणीस सचिन करमरकर आणि जिल्हा चिटणीस उमेश कुळकर्णी, माजी नगरसेवक राजू तोडणकर, समीर तिवरेकर, अशोक मयेकर, अॅड. विलास पाटणे, प्रवीण देसाई, पल्लवी पाटील, संपदा तळेकर यांच्यासमवेत धामणसेचे सरपंच अमर रहाटे, शेखर लेले, माजी सरपंच संदीप शिंदे, मंजिरी पाडळकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार, ऐश्वर्या जठार, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभेत मी पुन्हा येईन असे म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका केली, टिंगल उडवली पण धुरंधर राजकारणी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. आत १० बाय २० फुटाच्या भव्य स्क्रिनवर मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की… हे वाक्य ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
संध्याकाळी ५ वाजल्यापासून मारुती मंदिर येथे ढोल-ताशांचा गजर करण्यात येत होता. मी पुन्हा आलोच… हा देवेंद्र फडणवीस यांचा लावलेला बॅनर लक्ष्यवेधी ठरला. एकंदरित भाजपच्या जल्लोषी कार्यक्रमाचे सुरेख आयोजन करण्यात आले. हजारो लोकांना येथे लाडू वाटप करण्यात येत होते.
महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली कार्यकुशलता, नेतृत्व आणि कार्यक्षमता पूर्णपणे वापरतील. देवेंद्रजीं तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून त्यांना रत्नागिरीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो, असे अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.