
स्वत:च्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात एकमेव दिलेली सर्वश्रेष्ठ राज्यघटना : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव
रत्नागिरी, : समाजात सर्वांना घटनारुपी काठीची गरज आहे. स्वत:च्या मदतीसाठी आणि समोरच्याला सरळ करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेली काठी म्हणजे सर्वश्रेष्ठ राज्यघटना होय. तिचे वाचन दररोज करा. ती समजून घ्या. जसे मुलभूत अधिकार दिले आहेत, तसेच कर्तव्यंही सांगितली आहेत, असे मार्गदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, योजना शिक्षणाधिकारी किरण लोहार, समाजकल्याण उपायुक्त रविंद्र कदम, सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे आदी उपस्थित होते.
जिल्हा विधा सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. सातव यांनी प्रबोधनात्मक एक गोष्ट सांगून ते म्हणाले, बाबासाहेबांनी राज्य घटना लिहिताना सर्व घटकांचा विचार केला. सामान्य माणूस, कामगार, महिला, मुलं, शोषित वर्ग यांच्या बरोबरच उच्च शिक्षितांचाही विचार केला आहे. प्रत्येकांनी चौकटीत राहून आपा-पले काम प्रामाणिकपणे पार पाडावे. सक्तीच्या मोफत शिक्षणामुळे तुम्ही-आम्हा सर्वांना शिक्षण मिळाले. आम्ही सर्वजण जिल्हा परिषदेच्या, मराठी शाळेमधूनच शिक्षण घेतले आहे.
आजच्या संविधान दिनानिमित्ताने दररोज किमान ५ कलमांचे वाचन राज्यघटना समजून घ्या. जसे मुलभूत अधिकार दिले आहेत, तसेच कर्तव्यही सांगितली आहेत. समाज निरोगी आणि स्वच्छ राहिला पाहिजे. तसे प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते म्हणाले, कारभाऱ्यांना अधिकार आणि कारभाऱ्यांवर नियंत्रण या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी नियमांचा संच म्हणजे राज्य घटना होय. मुलभूत अधिकार, कर्तव्य राज्य घटनेने आपल्याला दिले आहेत. राज्य घटना जशी कठोर तशी लवचिक आहे. पण, तिची चौकट भक्कम आहे. राज्य घटनेने शिक्षण दिले, शिक्षणाच्या जोरावर आपण सर्व इथे आहोत. घराघरात संविधान आणि त्याचे वाचन ही आजची गरज आहे.
शिक्षणाधिकारी श्री. लोहार म्हणाले, घटनेने मुलभूत अधिकार देवून ६ ते १४ वयोगटातील मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण देऊन आपणा सर्वांना ताकद दिली आहे. मागासवर्गीय शिक्षणापासून वंचित होते.त्यांना शिक्षणाचे दार खुले झाले. या शिक्षणाच्या जोरावर तुम्ही सर्वांनी सर्वोत्तम अधिकारी व्हा.
सहाय्यक आयुक्त श्री. घाटे यांनी प्रास्ताविकात ‘घर घर संविधान’ कार्यक्रमाविषयी माहिती दिली. संविधानाची जागृकता, शिक्षण, मूल्य संस्कार, सक्रीय सहभाग आणि राष्ट्रीय एकात्मता यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सुरुवातीला डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रास्तविक प्रतिमेचे पुजन करुन दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. २६/११ मधील हुतात्म्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचनही करण्यात आले. समाज कल्याण निरीक्षक प्रताप कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल विनोद देसाई, रायपाटण येथील शासकीय मुलांचे वसतिगृहाचे गृहपाल दीपक जाधव, समाजकल्याण निरीक्षक रविंद्र कुमठेकर यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.