
मतदान करून लगेचच शेतीच्या कामावर
रत्नागिरी, ः दिवाळीत पडलेला पाऊस आणि एकादशीला धरून तीन दिवस पावसाचा शिडकावा यामुळे धास्तावलेला शेतकरी आज मतदान असूनही शेतात राबत असल्याचे दिसून आले. दुपारी कडकडीत ऊन पडत असल्याने पहाटे साडेपाच वाजल्यापासून शेतकरी शेतात जाऊन झोडणी आणि रब्बीची पेरणी करताना दिसून येत होता. सकाळी सकाळी मतदान करून शेत कामावर जाणे अनेक शेतकऱ्यांनी पसंत केले.
दिवाळीत पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचे कापणी आणि झोडणीचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे पुढील सर्वच नियोजन विस्कळित झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवाळीवेळी झोडणी केल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामाची तयारी करतो. त्या दृष्टीने शेतकऱ्याने नियोजन केले असले तरी पावसाने हे वेळापत्रक बिघडवले. त्यामुळे बुधवारी (ता. २०) मतदान असूनही मतदान करून लगेचच शेतकरी झोडणीसाठी शेतात गेल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे कापलेले भात न झोडताच रचून ठेवलेले होते. हे भात पावसाच्या उघडीपमुळे शेतकऱ्यांनी शेतातच झोडायला घेतल्याचे शेतात पाहायला मिळाले. पाच ते सहाजण मिळून एकत्रितपणे हे काम सुरू होते.