
महामार्गावर अगोदरच खड्डे, त्यात पाण्याचा फवारा
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरदरम्यान चौपदरीकरणामुळे सतत निर्माण होणाऱ्या धुळीचा त्रास कमी करण्यासाठी ठेकेदाराकडून पाण्याचे फवारे मारले जात आहेत. मात्र या पट्ट्यात अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांची पंचाईत होत आहे. हे खड्डे कधी बुजवणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर दरम्यान चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला आहे. दुपारच्या सुमारास कडकडीत ऊन पडू लागल्यामुळे खोदाई केलेल्या रस्त्यावरील माती पूर्णतः सुकलेली आहे. ही धूळ वाऱ्यामुळे सर्वत्र पसरत असून आजुबाजूच्या दुकानदारांना तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास होतो. याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला जाग आली आहे. गेले दोन दिवस संध्याकाळच्या सुमारास दुचाकी चालकांची संख्या अधिक असल्यामुळे धुळीवर पाण्याचा फवारा मारून धूळ कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. आता गेले तीन वर्ष डोक्याला तापदायक ठरणारे आणि वाहतूक संथगतीने सुरू असल्यास कारणीभूत ठरणारे खड्डे कधी बुजवणार, असा प्रश्न वाहनचालक आणि पादचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावत होती; मात्र ऑक्टोबरनंतर हे खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
—–
प्रवासातील अर्ध्या तासाची बचत
चिपळूण ते संगमेश्वर या पट्ट्यातील चौपदरीकरणाचे काम हळूहळू आटोक्यात येत आहे. मात्र संगमेश्वर ते रत्नागिरी या टप्प्यातील कामाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. चिपळूणमधून रत्नागिरीकडे येण्यासाठी सध्या किमान तीन तासाचा कालावधी लागतो. रस्त्याचे काम सुरू असले तरीही खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अडचणीचे ठरत आहे. खड्डे व्यवस्थित भरले तर प्रवासातील अर्धा तास कमी होईल, असे प्रवाशांकडून सांगितले जाते.