
गाव विकास समितीच्या रोजगार,हॉस्पिटल,स्थलांतर विषयीच्या प्रचारामुळे चिपळूण – संगमेश्वरची निवडणुक रंगात
ना सभा,ना रोड शो तरीही गाव विकास समितीच्या प्रचाराचा अनेकांनी घेतला धसका
संगमेश्वर– चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक दुहेरी होईल असं वाटत असतानाच गाव विकास समिती संघटनेच्या रोजगार आरोग्य शेती विकासावरील आक्रमक प्रचार यंत्रणेमुळे या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आता रंगतदार झाली आहे.
कोणताही गाजावाजा न करता,सभा,रोड शो न काढता केवळ मुद्द्यांच्या आधारे नागरिकांपर्यंत विषय घेऊन जाण्याच्या गाव विकास समितीच्या अनोख्या प्रचार यंत्रणेमुळे चिपळूण संगमेश्वर मध्ये बलाढ्य राजकीय पक्ष मेटाकुटीला आले असल्याचे बोलले जात आहे.
गाव विकास समितीच्या उमेदवार अनघा कांगणे यांची प्रचार यंत्रणा गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून यामध्ये तरुणांना रोजगारासाठी एमआयडीसी विकास,नागरिकांना वेळेत उपचार मिळावे यासाठी कॅशलेस हॉस्पिटल,शेती विकास आणि बंद पडणाऱ्या शाळाबाबत ठोस धोरण या मुद्द्यांचा प्रचार आक्रमकपणे गाव विकास समिती कडून करण्यात येत असून नागरिकांपर्यंत मुद्दे पोहोचवण्यावर गाव विकास समितीचा भर आहे.गाव विकास समितीने कोणतीही जाहीर सभा न घेता प्रचार रॅली न काढता किंवा रोडशो न करता झिरो बजेट इलेक्शन कॅम्पेन राबवत मतदारांपर्यंत मुद्दे पोहचवून व्हिजनवर आधारित निवडणूक होण्यासाठी आग्रह धरला आहे.या अंतर्गतच गाव विकास समिती सोशल मीडिया, परिपत्रक आणि प्रचार रथाच्या माध्यमातून आपले मुद्दे चिपळूण संगमेश्वर मधील जनतेपर्यंत पोहोचवत आहे.गाव विकास समितीच्या या अनपेक्षित प्रचार यंत्रणेमुळे रिंगणात असणाऱ्या बलाढ्य राजकीय पक्षांना आता आपल्या प्रचारात देखील रोजगार आणि आरोग्याचे मुद्दे घ्यावे लागत असल्याचे मत गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी याबाबत बोलताना व्यक्त केले.
दुसरीकडे गाव विकास समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी प्रचार सुरू असून या अंतर्गत स्थानिक नागरिकांना महत्त्वाचे मुद्दे कोणते हे पटवून दिले जात आहे. खरंतर चिपळूण संगमेश्वर मधील नागरिकांना आरोग्य, रोजगार,शेती विकास आणि शिक्षण हे चार मुद्दे महत्त्वाचे असल्याचे गाव विकास समितीचे कार्यकर्ते प्रचारातून पटवून देत आहेत. याचा परिणाम जनमानसात होऊ लागल्याचे बोलले जात आहे. गावांच्या भविष्यासाठी यंदा मतदान करा ही गाव विकास समितीची भूमिका लोकांना पटू लागली असल्याचे उदय गोताड म्हणाले.एकंदरीत दुहेरी वाटणारी लढत आता तिरंगी होऊ घातल्याचे बोलले जात आहे.गाव विकास समितीच्या आक्रमक प्रचार यंत्रणेमुळे राजकीय पक्षांनाही अनपेक्षित धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.