
बाळ मानेंशी आता संबंध नाही
रवींद्र चव्हाण; महायुतीचे उमेदवार निवडून आणणार
रत्नागिरी:- विधानसभा निवडणुकीला या वेळी वेगळ्या वातावरणात सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात भाजपशी फारकत घेणाऱ्यांशी आपली बांधिलकी संपली, त्यांच्याशी आता आपला काही संबंध नाही, असा टोला भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांना लगावला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
शहरातील जयश मंगल पार्कमध्ये महायुतीतील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी उमेदवार उदय सामंत, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार प्रमोद जठार, अॅड. बाबा परूळेकर, अशोक मयेकर, अॅड. विलास पाटणे, विवेक सुर्वे, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपला जिल्ह्यात एकतरी जागा मिळावी यासाठी आमचे टोकाचे प्रयत्न होते; परंतु त्याला यश आले नाही. महायुतीत हे आपले एक परिवार आहे आणि एक परिवार म्हणून आपल्याला प्रामाणिक काम करायचे आहे. फडणवीस आणि मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पसरवला जाणारा फेक नॅरेटिव्ह आपल्याला हद्दपार करायचा आहे. त्यासाठी टोकाचा प्रयत्न करून सुक्ष्म नियोजन करा. केंद्र आणि राज्य शासन आपल्या सर्वसामान्यांचे आहे. आपण जनतेसाठी किती योजना आणल्या, हे लोकांपर्यंत पोहोचवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आपल्या पक्षाशी फारकत घेणाऱ्याशी आता संबंध नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.