
तक्रारींचे निराकरण तात्काळ करावे निवडणूक निरीक्षकांची तक्रार निवारण कक्षाला भेट
रत्नागिरी,: आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हिजील ॲपवर दाखल झाल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करा. तसेच तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या शंकेचे निरसन झाल्याची खात्री करा, असे सांगून निवडणुकीशी संबंधित तक्रार व मदत मागितलेल्या व्यक्तींचीही तक्रार निरसन झाल्याची शहानिशा करा, अशी सूचना सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी दिली.*
निवडणूक नियंत्रण कक्षाला सर्व सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेंद्र प्रसाद मीना यांनी काल सायंकाळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी निवडणूक नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेवून निवडणूक निरीक्षकांनी या कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.