
रत्नागिरी मतदारसंघात आठ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी:-
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी एका अपक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये आठ उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात महायुतीकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मविआकडून उबाठाचे बाळ माने, बसपाचे भारत पवार यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपयर्र्त मुदत होती. यात शिवसेना उबाठाचे बंडखोर उमेदवार उदय बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर उदय सामंत आणि बाळ माने यांनी जादाचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आठ उमेदवार आहेत.
विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले. महायुतीकडून शिवसेनेचे उदय सामंत यांना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. तर महाविकास आघाडीकडून उबाठाचे बाळ माने यांना मशाल चिन्ह मिळाले आहे. भारत पवार यांना बसपाचे हत्ती हे चिन्ह मिळाले आहे.
या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 5 अपक्ष उमेदवार असून यात कैस नूरमहमंद फणसोपकर यांना हवर ग्लास हे चिन्ह मिळाले आहे. कोमल किशोर तोडणकर यांना कॉम्प्युटर, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील यांना माचिस ही निशाणी मिळाली आहे. दिलीप काशीनाथ यादव यांना इस्त्री तर पंकज प्रताप तोडणकर यांना बॅट ही निशाणी मिळाली आहे.