
रत्नागिरीत वक्फ बोर्ड कार्यालयाचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
रत्नागिरी:- रत्नागिरीतील कुवारबाव येथे वक्फ बोर्ड कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नागरिकांची मागणी होती की, रत्नागिरी मध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय असावे.आणि त्या साठी वेळोवेळी पाठपुरावा देखील इथले सामाजिक कार्यकर्ते करत होते. कोणत्याही कामासाठी छत्रपती संभाजी नगर येथे जावे लागत होते. होणारी हेळसांड थांबण्यासाठी रत्नागिरीतील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मंत्री उदय सामंत यांच्या पुढे विषय मांडला. आणि नामदार उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे वक्फ बोर्डाचे कार्यालय मंजूर करून घेतले. आज त्याचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी ना. उदय सामंत म्हणाले की आजच्या या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणे गरजेचे होते. मात्र ते कुठे आलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे आगामी काळात सर्व बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी सुद्धा हिंदूच आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे. या वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या संदर्भात काही गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत हे चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया ना. उदय सामंत यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, शिरगावचे माजी सरपंच रज्जाक काझी, रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगरसेवक सुदेश मयेकर, राजापूर अर्बन बँकेचे संचालक अल्ताफ संगमेश्र्वरी, रत्नागिरी शहर प्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक मुसा काझी, फय्याज मुकादम, मुज्जू मुकादम, इरफान साखरकर, मेहताब साखरकर, इल्लू खोपेकर,, नदीम सोलकर,सुहेल लाला आदी मान्यवर उपस्थित होते.