
बंड्या साळवी यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून माघार
दोघांपैकी ज्याची उमेदवारी निश्चित होईल त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार
रत्नागिरी : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने आणि राजेंद्र महाडिक यांचे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मोठे योगदान आहे ते दोघेही या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या शर्यतीतून माघार घेत आहे असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी जाहीर केले.
शिवसेनेकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, शिवसेनेचे विद्यमान जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह तालुकाप्रमुख बंड्या साळवी हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या जिल्हा दौऱ्यात या तिघांनीही उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या होत्या. मात्र २८ सप्टेंबरला पक्षाची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे बंड्या साळवी यांनी सांगितले. तसेच इच्छुक उमेदवार उदय बने किंवा राजेंद्र महाडिक यांच्यापैकी कोणालातरी उमेदवारी द्यावी अशी मागणी करतानाच या दोघांपैकी ज्या उमेदवाराला उमेदवाराची उमेदवारी निश्चित होईल त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि शिवसैनिक निश्चितपणे प्रयत्न करतील, असे आश्वासन दिले.
पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आम्हाला अपयश आले असले तरीही रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सुमारे दहा ते साडेदहा हजारांचे मताधिक्य आणि दिले होते. या विधानसभा निवडणुकीत आपल्याला हा आकडा आणखीन मोठा दिसेल, असा विश्वास श्री. साळवी यांनी यावेळी व्यक्त केला.