
महामार्गावर गणेशोत्सवात यंदा शुन्य प्राणांतिक अपघात
रत्नागिरी : रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- गोवा या प्रमुख राष्ट्रीय महामार्गासह अन्य राष्ट्रीय, राज्य मार्गाने गणेशोत्सवात गावी येणार्या चाकरमान्यांचा प्रवास विनाअपघात सुखकारक होण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेकडून राबवण्यात आलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळेच यंदा शून्य प्राणांतिक अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. याचबरोबर किरकोळ अपघातांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात यश आले आहे.
एकीकडे जिल्हयातील सर्वच राज्य व राष्ट्रीय महामार्गांचे अपूर्ण चौपदरीकरण, इतर कारणांनी दुरवस्था झालेली असतानाही महामार्ग वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय राखत महामार्गावर अपघात होणाऱ्या ब्लॅक स्पॉट वर व इतर ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना करून घेण्यात आल्या आहेत. गतवर्षीपासून मृत्युंजयदूतसारखा महत्वाकांक्षी उपक्रम उत्तमरित्या राबवल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.
चिपळूण, हातखंबा,कसाल या तीन पोलीस मदत केंद्राच्या अखत्यारित राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मागील वर्षांचा विचार करता तुलनात्मकरितीने अत्यंत अपघात कमी झाले आहेत. अपघाती मृत होण्याचे प्रमाण मात्र यंदा शून्य राखण्यात यश आले आहे. तर गंभीर जखमी २, तर किरकोळ जखमी ४६ झाले आहे हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत फार कमी झालेले आहे.
रत्नागिरी विभाग महामार्ग वाहतूक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस महासंचालक सुरेशकुमार मेकला, महामार्ग वाहतूक पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, रायगड परिक्षेत्र पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, पोलीस उपअधीक्षक घनश्याम पलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.यंदाच्या गणेशोत्सवात दरवर्षीचे तुलनेत महामार्गांवर वाहतुकीत प्रचंड वाढ झाली होती. यावेळी काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने त्यांना शिस्त लागण्यासाठी कारवाई केली
गेली. प्रामुख्याने महामार्गावर सातत्याने अपघात होणार्या ब्लॅकस्पॉटवर विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पाठपुरावा करुन तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करून घेण्यात आल्या होत्या.चौपदरीकरणातील अपूर्ण कामांच्या ठिकाणी पर्यायी वळण रस्ते काढून तिथे दिशादर्शक फलक, रिफ्लेक्शन बोर्ड या गोष्टी केल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना सोयीचे झाल्याने वाहतुक कोंडी टाळली गेली. इंटरसेप्टर वाहनाद्वारे अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे त्यामुळे वाहनांना शिस्त लागत आहे.