
स्वयंपाक घरातील लसूण महागली; दर चारशे रुपये किलो
रत्नागिरी : स्वयंपाक घरातील लसणाची फोडणी पुन्हा एकदा महागली आहे . किरकोळ बाजारात लसणाचे दर 400 रूपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे घरोघरी किचनचे बजेट पुन्हा एकदा गडबडले आहे. या वर्षात दुसर्यांंदा लसणाने शतकी भाव खाल्ला आहे तर नित्याच्या आहारातील कांदे आणि बटाटेही पन्नाशीच्या खाली येण्याचे नाव घेत नाही. यामुळे गृहिणी या ऐन गणपती उत्सवाच्या उत्साहातही महागाईने नाराज आहेत.
लसूण, कांदे आणि बटाटे हे नित्याच्या आहारातील स्वयंपाकाचा कणा आहेत. मात्र, श्रावण संपल्यानंतर आता भाद्रपदातही नित्याच्या या वस्तू महागलेल्या असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गणपतीच्या सणात आधीच महागाईने ग्रासले असताना भाज्या आणि साहित्यही महागल्याने सामान्यात प्रचंड नाराजी आहे. लसणाशिवाय डाळीची, भाजीची फोडणी पूर्ण होत नाही. त्यामुळे थोडा का होईना लसूण खरेदी करावा लागतोच. पण लसणाचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे एक किलो लसूण घेणारे आता मात्र पाव किलो वर समाधान मानत आहे. तेही शंभ रुपये मोजावे लागत असल्याने गृहिणीमध्ये लसणीपेक्षाही जास्त उग्रता स्वयंपाक करताना किचनमध्ये व्यक्त होत आहे.
बाजारात सध्या मध्यप्रदेश , राजस्थान आणि गुजरातच्या लसूणाची आवक होत आहे. घाऊक बाजारात गावठी लसूण उपलब्ध आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे लसणाची कमतरता बाजारात जाणवत आहे . त्यामुळे लसणाचे दर वाढले असल्याचे येथील मंगळवार बाजारपेठेतील व्यापारी सांगतात. लसणाप्रमाणे कोथिंबीरीचे वधारलेले भाव मात्र काहीअंशी कमी झाले आहे. अचानक झालेल्या या भववाढीमुळे सर्व सामान्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
कोथिंबीरसह इतर भाज्यांच्या दरात तब्बल 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खास करून पालेभाज्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढत्या महागाईचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. या सर्व स्थितीचा विचार करता सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट ऐन गणपती उत्सवात कोलमडून गेले आहे.