
हमाल पंचायत जपतेय राष्ट्रीय एकात्मता
सार्वजनिक मंडळ; ९० हमाल कार्यरत
रत्नागिरी: साळवी स्टॉप येथील रत्नागिरी तालुका हमाल पंचायत गेली अनेक वर्षे गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रीय एकात्मता जपत आहे.महाराष्ट्रातील मराठी भाषिक, कर्नाटकातील रहिवासी यांच्यासह हिंदू-मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक एकत्र येऊन हा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करत आहेत.
रत्नागिरीत १९७९ पासून तालुका हमाल पंचायतीचे काम सुरू आहे. १९९४ मध्ये हमाल पंचायत नोंदणीकृत होऊन महाराष्ट्र माथाडी कामगार महामंडळाशी संलग्न झाली. १९९९ पासून पंचायतीने राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. मिरज, जत, सांगोला, पंढरपूर आदी भागांसह कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, इंडी येथील ९० हमाल कार्यरत आहेत. त्यातील काही कन्नडभाषिक आहेत. या शिवाय मुस्लिम, ख्रिश्चन, धनगर, कोळी समाजाचे आणि हिंदू आहेत. सर्वजण एकोप्याने उत्सव साजरा करत असून सकाळ- संध्याकाळी आरतीसाठी एकत्र येतात.
हमाल पंचायतीचे अध्यक्ष वसंत पाटील, उपाध्यक्ष लालसाब मुजावर, सचिव अंबादास कोळी, जनरल सेक्रेटरी मगदूम जहागिरदार, सरचिटणीस इरप्पा बळगानुर, खजिनदार शिवाजी चांदे, सदस्य अप्पा गावडे, विनोद निमग्रे, विनोद दोरखडे, हुसैन जहागिरदार, लालसाब बाडगर, दादून नागूर, सर्जेराव पाटील, पांडुरंग कांबळे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने उत्सव साजरा होतो. सुमारे दहा ट्रान्स्पोर्ट कंपन्यांमार्फत दररोज सुमारे पंचवीस ते तीस ट्रक रत्नागिरीत येतात. साळवी स्टॉप येथील हमाल पंचायतीच्या कार्यालयातून हमाल या ट्रकवर हमाली करून पैसे कमवतात. गणेशोत्सवात विशेष कार्यक्रम नसला तरी नित्यपूजा, आरती होते. दरवर्षीप्रमाणे सत्यनारायण महापूजा व दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यासाठी जास्तीतजास्त नागरिक, साळवी स्टॉप परिसरातील रहिवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हमाल पंचायतीने केले आहे.