
रत्नागिरी शहरातील २० सीसीटीव्ही बंद
विद्युत पुरवठासह केबलची समस्या; लवकरच पर्याय काढणार
रत्नागिरी: शहरातील चंपक मैदान येथे एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण पुढे आल्यानंतर रत्नागिरी शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील एकूण ५७ पैकी २० कॅमेरे बंद असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. काही ठिकाणी केबलमधील तांत्रिक त्रुटींमुळे कॅमेरे बंद आहेत तर काही ठिकाणी विद्युत पुरवठा होत नाही. स्ट्रीटलाईटवरून काहींना जोडणी दिल्यामुळे ते फक्त स्ट्रीटलाईट लागल्यानंतर सुरू होतात. प्रत्येक कॅमेऱ्यासाठी स्वतंत्र मिटर घेणे शक्य नाही; परंतु त्यावर लवकरच पर्याय काढला जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
रत्नागिरीत सोमवारी एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला. ती तरुणी साळवीस्टॉप येथे बसमधून उतरली. तिथून ती चार ते पाच किलोमीटर अंतरावर चंपक मैदानावर बेशुद्धावस्थेत सापडली. ती तिथपर्यंत कशी पोहोचली याचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही हा सर्वांत उत्तम पर्याय आहे; मात्र पोलिसांनी शहरात बसवलेल्या सीसीटीव्हीपैकी साळवीस्टॉप येथील कॅमेरा बंद होता. त्यामुळे तेथील माहिती मिळालेली नाही.
शहरातील सीसीटीव्हींविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, रत्नागिरीमध्ये ५७ सीसीटीव्ही बसवले होते. वारा-पाऊस यामुळे काही सीसीटीव्हीची फायबर केबल तुटली आहे. सीसीटीव्हीसाठी आवश्यक विद्युतपुरवठ्याची व्यवस्था स्वतंत्रपणे केलेली नाही. रत्नागिरी पालिकेच्या पथदीपांवरून वीजपुरवठा घेतलेला आहे; मात्र, पथदीप फक्त रात्रीच सुरू असतात. त्यामुळे हा पर्याय फारसा उपयुक्त ठरत नाही. त्यामुळे ५७ पैकी २० सीसीटीव्ही बंद आहेत. सध्या ३७ सीसीटीव्ही चालू आहेत. बंद कॅमेरे सुरू ठेवण्यासाठी पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्व सीसीटीव्ही कार्यरत होतील.