
लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ लाख ९८ हजार मंहिलांच्या खात्यात पैसे जमा : ना.उदय सामंत
रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ लाख ९८ हजार महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे महायुतीने आपली कमिटमेंट पूर्ण केली अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, वित्तीय तूट महाराष्ट्र राज्यामध्येच आहे असं नाही, देशाच्या अनेक राज्यांमध्ये वित्तीय तूट आहे. वित्तीय तूट भरून काढण्याच्या संकल्पना महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या डोक्यात आहेत. त्यामुळे वित्तीय तूट सांभाळणं ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. वित्तीय तूट भरून काढण्याचं कसब सरकार मध्ये आहे. आमच्या योजनांमुळे राज्यात आता महायुती पुढे गेली असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
मुख्यंमत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वादावादी झाल्याचा प्रश्नावर बोलताना सामंत म्हणाले की, विकासावर राजकारण झालं पाहिजे. खोटं बोलण्याला सुद्धा काही प्रमाण आहे. सूत्रांकडून अशी वृत्त पुढे आणली जात आहेत. कॅबिनेटमध्ये असं काही घडलेलं नाही. दोन्ही नेते परिपक्व आहेत.
महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद तिन्ही नेत्यांमध्ये आहे. कॅबिनेट अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे, असेही सामंत म्हणाले.
चौकट
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी विधानसभा मतदार संघात इतर पक्षांकडून उमेदवार चाचपणी सुरू आहे या मुद्यावरुन सामंत म्हणाले माझ्या मतदारसंघात लोकशाही जिवंत आहे. माझ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सप्तरंगी लढत व्हावी. रत्नागिरीत विरोधकांना उमेदवार सापडत नाही म्हणून मुंबईतून आणणार आहे. मुंबईतून कशाला अमेरिकेतून येऊ दे, फक्त त्यांनी नागरिकत्व घेतलं पाहिजे असे ते म्हणाले.