
जिल्ह्यातील २७३ गावांचा संरक्षित क्षेत्रात समावेश
रत्नागिरी: केंद्र शासनाने पश्चिम घाटाचा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २७३ गावांचा समावेश केला आहे. त्या गावांमध्ये नवीन बांधकाम करताना, गौणखनिजांचे उत्खनन तसेच नवीन प्रकल्पांना बंदी घातली आहे. तसेच या क्षेत्रातील वृक्षतोडीवर तसेच उत्खननावर केंद्राच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन विभागाने निर्बंध घातले आहेत.
पश्चिम घाटाला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्यासाठीचा पाचवा मसूदा केंद्राने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील १७ हजार ३४० चौरस किलोमीटर क्षेत्र संवेदनशील म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. यापूर्वी २०२२ साली जाहीर केलेल्या मुसद्यानुसार राज्यातील २१३३ गावांचा समावेश होता. त्यातील ३८८ गावे वगळण्याची मागणी करण्यात येत होती. गतवर्षी ५८२ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला
होता. त्यानंतर संवेदनशील गावांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम-पेढे, राजापूर, खेड, लांजा येथील अनेक गावांचा समावेश आहे. या संरक्षित क्षेत्रात विविध प्रकारच्या प्राणी, किटक, वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजाती आहेत. तसेच या संरक्षित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेली वृक्षतोड तसेच वेगवेगळे रहिवासी प्रकल्प मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी करण्यात येणारा जेसीबी, पोकलेनचा वापर, वाळू गौणखनिज उत्खनन यामुळे डोंगर माथ्यावरच्या मातीचा भाग घसरतो. हे लक्षात घेऊन हा भाग संवेदनशील जाहीर करण्यात आला आहे.
.